लोकशाही विशेष लेख
आज एक मे 1960 साली आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी राज्यातील महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. आजच्या 60 व्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ यात महराष्ट्राबद्दलच्या 60 खास गोष्टी……..
1) महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.
2) महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कुवेत, पनामा, फिजी, कतार, ओमान, आर्यलँड, भूतान या देशांपेक्षाही अधिक आहे.
3) लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.
4) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972
5) महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ 11 देश आहेत.
6) मराठी बोलणाऱ्यांची संख्या सहा कोटी 24 लाख 81 हजारहून अधिक आहे.
7) महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.
8) देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.
9) महाराष्ट्रात 17 थंड हवेची ठिकाणे आहेत.
10) महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे.
11) महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य आहे.
12) ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.
13) प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असे भाग पडतात.
14) महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.
15)सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राची ओळख या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात.
16) महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे 2014 साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.
17) एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी 13 टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.
18) महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंद्यांमध्ये रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योगांचा समावेश होतो.
19) धातू उत्पादने, वाईन, दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स हे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत.
20) आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्यासारखी पिके महाराष्ट्रातील प्रमुख पिके आहेत.
21) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नगदी पिकांमध्ये शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखूचा समावेश होतो.
22) माहाराष्ट्रातील 33,500 चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली आहे.
23) भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे निर्मितीचे प्रमुख केंद्र मुंबई आहे.
24) भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबईत आहे.
25) कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.
26) महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड, शिवनेरी, व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे आहेत.
27)महाराष्ट्राला 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.
28) गोंधळ, लावणी, भारुड, अभंग आणि पोवाडा हे लोकसंगीताचे प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. हे लोकसंगीत महाराष्ट्राची खरी ओळख आहेत.
29) ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर असे काही काही प्रमुख लेखक व कवी महाराष्ट्राने देशाला दिले आहेत.
30) मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची यादी सांगायची झाल्यास व्ही. शांताराम, दादा कोंडके, बाबुराव पेंटर, पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील.
31) मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला.
32) संगीतनाटके आणि नाट्यसंगीताचा महाराष्ट्राला मोठा वारसा आहे.
33) बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी एकेकाळी रंगभूमी गाजवली आहे.
34) कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी प्रामुख्याने जास्त खाल्ली जाते.
35) मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष हा नऊवारी साडी तर पुरुषांचा पारंपारिक वेष हा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे.
36) दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत.
37) शिवजयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा हे सण देखील उत्साहात साजरे होतात.
38) स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली.
39) स्त्री शिक्षणाच्या चळवळीसाठी महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते. या लोकांचे कार्य हे देशातील इतर राज्यांमधील समाज सुधारकांसाठी दिशादर्शक ठरले.
40) राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.
41) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध आहे.
42) एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. एस.टी. बस या ग्रामीण महाराष्ट्राची लाइफ लाइन आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
43) महाराष्ट्रात पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.
44) मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.
45) मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत.
46) महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अमरावती, सातारा या शहरांचा समावेश होतो.
47) महाराष्ट्रातील लेणी, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात.
48) महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे.
49) महाराष्ट्रातील लोणार सरोवर जगभरात प्रसिद्ध आहे. उल्का पडल्याने तयार झालेल्या या सरोवराचे वय 52 हजार वर्षांहून अधिक आहे.
50) महाराष्ट्रातील शनीशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. याच कारणामुळे हे देवस्थान जगभरात प्रसिद्ध आहे.
51) महाराष्ट्रातील नवापूर रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात येतो तर अर्धा गुजरातमध्ये येतो.
52) औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराभोवती एकूण 52 प्रवेशद्वार बांधण्यात आले होते त्यापैकी आज 13 प्रवेशद्वारे सुस्थितीमध्ये आहेत.
53) देशातील सरकारच्या मालकीचे सर्व सोने हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूरमधील केंद्रात आहे.
54) मुंबईमधील लोकल ट्रेनमधून रोज जवळजवळ 60 लाख प्रवासी प्रवास करतात. हा आकडा इस्त्राइलच्या लोकसंख्येहून अधिक आहे.
55) युनिस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार स्थळं महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अजिंठा लेणी, वेरुळ लेणी आणि एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.
56) शेखरु म्हणजेच Indian giant squirrel या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे. तर हिरव्या कबुतराला म्हणजेच Green Imperial Pigeon राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
57) कब्बडी हा राज्याचा प्रमुख खेळ आहे.
58) महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.
59) केंद्र सरकारला सर्वाधिक रक्कम कराच्या स्वरुपात देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. डिसेंबर 2019 ला महाराष्ट्राने 13 हजार कोटींहून अधिक रक्कम जीएसटी (वस्तू व सेवा कर) म्हणून केंद्राला दिली आहे.
60) महाराष्ट्र हा शब्द संस्कृतमधून आल्याचे मानले जाते. संस्कृतमधील ‘महा’ म्हणजेच महान आणि ‘राष्ट्र’ म्हणजे देश हे दोन शब्दांना एकत्रित करुन तयार झाला आहे. महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महान राष्ट्र.