जळगाव :- शिवाजी नगर पूलाच्या ‘टी’ आकाराचे काम रखडले असून नागरिकांकडून त्यासाठी पाठपुरावा सुरु आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे पुलाच्या ‘टी’ आकाराचा विषय जैसे थे होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महापालिका व सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामाला सुरुवात करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे ‘टी’ मार्गांचे रखडलेले काम मार्ग लागणार आहे.कार्यकर्त्यांनी ‘टी’ पूलाचे काम तातडीने सुरू करावे यासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेतली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज पूलाच्या कामाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे, अधिक्षक अभियंता गिरीश सूर्यवंशी, महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, नगररचना विभागाचे अभियंता शकिल शेख, पुराणीक, तसेच माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, सामाजिक कार्यकर्ते विजय राठोड, स्वप्नील साकळीकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘टी’ पूलाच्या शिवाजी नगरातील सामाजिक कामाच्या नकाशानुसार पाहणी केली,
त्यानंतर त्यांनी काम सुरू करण्याचे आदेशही दिले.
शिवाजी नगर ‘टी’ पूलासाठी बाजूला १५ मीटर रस्ता आवश्यक आहे, तसेच या पूल पुढे थेट ममुराबाद जवळ असलेल्या फोरलेनला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी या ठिकाणी
असलेले काही घरांचे अतिक्रमण काढावे लागणार आहे. त्यामुळे त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकच्या नगररचना विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पूलाला काही नागरिकांनी विरोध केल त्या नागरिकांनीही जिल्हाधिकाऱ्यांच भेट घेतली.