पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते; पतीने केले धक्कादायक कृत्य…
औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:
नरबळीच्या संशय असलेल्या प्रकरणात नाट्यमय खुलासा औरंगाबाद पोलिसांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी शेंदूर लावलेल्या दोन दगडांखाली मानवी सांगाडा आढळून आल्यानंतर औरंगाबादमध्ये (Aurangabad) खळबळ उडाली होती. हा सांगाडा नेमका कुणाचा आहे. पुरुषाचा की महिलेचा याबाबत तपास पोलिसांकडून सुरु होता. अखेर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. यात एक धक्काफ्दाय्क बाब उघडकीस आली आहे. आपल्या मृत पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने पतीने तिला पुरल्याचे यात समोर आले आहे.
सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे वाळूजच्या समता कॉलनी परिसरात दोन मजली घर आहे. ज्यात तळमजल्यावरील दोन खोल्यांमध्ये भाडेतत्वावर भुईगड हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. तीन महिन्यांपूर्वी नवरात्रीसाठी भुईगड येथे जात असल्याचे त्यांनी घरमालकाला सांगितले. शेळके यांनी भाडे देण्यासाठी अनेकवेळा भुईगड यांना फोन लावला. पण त्यांनी काहीच उत्तर दिले नव्हते. तीन महिने घर बंदच असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं अखेर शेळके यांनीच घरी येऊन कुलूप तोडले. दार उघडताच चित्र पाहून सारे हादरले. स्वयंपाक घरात ओट्याखाली वाळू, बांधकाम केलेलं दिसलं. तेथे शेंदूर लावलेले दोन दगड आणि लिंबू-मिरची ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्यात आली. स्वयंपाक घरातल्या त्या जागेत मानवी सांगाडा आढळून आला.
अखेर पोलिसांनी सदर प्रकरणाचा खुलासा केला. आजारपणात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे पतीनेच सासूच्या मदतीने पत्नीचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला असल्याचे समोर आले आहे. वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून हा खुलासा केला.
अनिता भुईगड असं या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे मृतदेह स्वयंपाक घरात पुरावा लागण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली होती. त्यामुळे मृत्यूही आता महाग होत चालला आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.