जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पावसाळा म्हंटल म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी सर्वचजण आतुर असतात. पण याच उतावळेपणाच्या नादात बरेचजण आपला जीव गमावून बसतात. तालुक्यातील सातपुडा पर्वतरागांच्या निसर्गरम्य ठिकाण असेलेले ‘निंबादेवी धरण’ (Nimbadevi Dam) ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. प्रशासनाने तालुक्यातील सर्व पाणीसाठे असलेले क्षेत्र प्रतिबंधित केले आहेत. तरी देखील पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या ठिकाणी गर्दी होऊन काही अनुचित घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत हे स्थळ पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. कोरोनापासून स्थळ हे प्रकाशझोतात आले. कधी हे धरण ओव्हरफ्लो होते, याची पर्यटक वाट पाहतात. दोन दिवसांपूर्वी हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात धरणावर होत असलेली गर्दी पाहता, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी हे क्षेत्र प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.