नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशात अनेक राज्यात कडाक्याचा हिवाळा जाणवत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात तर थंडीची लाट दिसून येत आहे. त्यामुळे दाट धुके दिसत आहे. या धुक्यामुळेच रेल्वेला फक्त दोनच दिवसात कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. सततच्या खराब वातावरणामुळे थंडी वाढली असतानाच नागरिकांना वाहतुकीच्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खराब हवामानाचा रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम होत आहे.
भारतीय रेल्वेने खराब हवामानामुळे 1030 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. तर 24 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, नवी दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार आणि झारखंड दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या ट्रेनची स्थिती जाणून घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये. धुक्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ट्रेन रद्द झाली किंवा उशीर झाला तर या काळात रेल्वे स्टेशनवर थांबण्याचा मनस्ताप सहन करावा लागतो.
कोणती ट्रेन रद्द झाली ते अशा प्रकारे जाणून घ्या
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट रेल्वेच्या वेबसाइटवर टाकते. याशिवाय त्याची माहिती NTES App वरही उपलब्ध आहे. कोणत्याही ट्रेनची स्थिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे ट्रेनचा नंबर टाकून तुम्ही तिची स्थिती जाणून घेऊ शकाल.
याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीला रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण लिस्ट पहायची असेल, तर त्यासाठी त्याला रेल्वेच्या वेबसाइटवर असलेल्या ‘एक्सेप्शनल ट्रेन्स’ सेक्शनवर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर रद्द झालेल्या सर्व गाड्यांची माहिती समोर येईल. रेल्वेच्या वेबसाईटशिवाय NTES App वरही रद्द झालेल्या ट्रेन्सची माहिती मिळू शकते.