बोगस खतांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी
बाधित क्षेत्रावर शाश्वत उपाययोजना करण्याची केली मागणी
मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हयातील बोदवड, जामनेर, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशी आणि अन्य पिकांना गुजरात सरदार ऍग्रो कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट या रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे शेतातील कापसाची वाढ खुंटली तर काही ठिकाणी पिक खराब झाले. यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज बोदवड तालुक्यातील शेतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या सरदार कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट खतांच्या वापरामुळे शेतकरी बांधवांचे या हंगामातील पिक तर वाया गेले आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शेतकरी हावलदील झाले. शेतकऱ्याने पीक उपटून टाकावे की तसेच ठेवावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण हंगामाची वेळ निघत चालली आहे. तसेच ज्या जमिनित खत दिले ती जमीन नापिक होण्याची श्यक्यता आहे. यावर जर शासनाकडून शाश्वत उपाययोजना केली गेली नाही तर जमिन नापिक झाल्यामुळे शेतकरी बांधवावर आत्महत्या करण्याची वेळ येईल.
सद्य स्थितीत केवळ, कापूस सह अन्य पीक नुकसान झाले म्हणून काही रकमेची हेक्टरी भरपाई करून आणि कंपनीचा परवाना रद्द करून हि बाब थांबणार नाही. पैशाची मदत हा केवळ मुलामा होईल. यातून शेतकरी बांधवांची फसगत होईल. वेळ मारून घेतल्या सारखे होईल. खरं तर तणनाशक, बीजनाशक पावडर चा अंश यात असल्याने जमीन बाधित झाली आहे. यामुळे कित्येक हंगाम हे तणनाशक मिश्रित खत जो पर्यंत जमिनीत आहे. तो पर्यंत ही बाधा शेतपिकाला होत राहील.
यावर हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली तर ती फक्त पिका पुरती होईल, मात्र मुळात जमीनच बाधित झाली, खराब झाली तर त्यावर मृदा शास्त्रज्ञ यांच्या परीक्षणानुसार त्यात जमीन सुधारणा मोहीम हाती घेऊन बाधित जमिनीवर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी (MREGS )योजनेअंतर्गत सदर शेतकरी बांधवांना नाजिकच्या तलावातून गाळ, माती टाकण्यासाठी मृदा शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार हेक्टरी मापदंड वापरून पुन्हा जमिनीची उत्पादकता वाढवावी लागेल.
यातून नुकसान ग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबाला रोजगार मिळेल आणि बाधित जमीन सुपीक होण्यासाठी मदत होईल.
अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारकडे करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी संगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, रामदास पाटील, विजय चौधरी, सतिष पाटील, प्रदिप बडगुजर, समाधान वाघ, चेतन राजपूत आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.