मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
परीक्षेची पद्धत तसेच अभ्यासक्रमात बदल केल्याने MPSC वर काही विद्यार्थ्यांचा गट आक्रमक झाला असून त्यांनी आयोगाला आंदोलनाचा इशारा दिला होता.
बदलेल्या परीक्षा पॅटर्न हा केंद्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणे असणार आहे. काही विद्यार्थ्यांनी या बदलाला विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला. परंतू MPSC नेच थेट आंदोलकांनाच इशारा दिला आहे. आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल. असे आयोगाने म्हटले आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 23, 2022
यापुढे यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा होणार आहे. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या प्रयत्नात आहेत. पण, त्याआधीच एमपीएससीनं इशारा दिल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवीन परीक्षा पद्धतीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) हटविण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सर्व पेपर वर्णनात्मक स्वरूपात द्यावे लागणार आहेत. सन २०२३ पासून सर्व परीक्षांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. याला विद्यार्थी संघटना विरोध करीत असून, इतके वर्षे एमसीक्यू पद्धतीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
एमपीएससीने हा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र, यामध्ये कोणतीही संघटना समोर न येता विद्यार्थी ही मागणी करीत आहेत. तसेच ही मागणी मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला होता. मात्र, इशारा दिल्यावर अखेर विद्यार्थ्यांनी २५ जुलैला करण्यात येणारे आंदोलन मागे घेतले आहे.