‘संघर्षयोद्धा’ चित्रपट 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात
जळगाव ;– मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला ही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखन केले आहे.
सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे अशी माहिती दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
“संघर्षयोद्धा” हा माझा पहिलाच बायोपिक आहे. याआधी मी मुसंडी, मजनू , धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणे हे जरा सोपे असते कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट हे तेवढेच कठीण असते. त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठे चॅलेंज होते. पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली; त्यामुळेच हे शिवधनुष्य पेलू शकलो असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा करायला मिळाली. आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका केल्या आहेत पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खुप काही देऊन गेली आहे. संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहचलेले आहेत. त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला आहे आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली असल्याचे अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितले.
खडतड संघर्षावर फोकस
मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिति करण्याचा निर्णय घेतला. केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत ही छोटी गोष्ट नाही. त्यांनी आजवर अनेक उपषोण केली हार मानली नाही. माझे मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिति करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले.
यांची आहे प्रमुख भूमिका
सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या ‘उधळीन जीव…’ या गीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.