मानवी जीवनातील सूर्यनमस्काराचे महत्व

0

लोकशाही विशेष लेख

 

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला आद्य मानून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. यामाध्यमातून एक प्रकारे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. आपल्या संस्कृतीमध्ये कधी झाडाची पूजा केली जाते तर कधी नद्याची पूजा होते, तर कधी महासागर, पर्वत एवढंच काय तर विशिष्ठ तिथीस नाग, गाय, बैल यासारख्या प्राण्यांची देखील पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच प्रमाणे माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. यानिमित्त समस्त सृष्टीचे पालन आणि पोषण करणाऱ्या सूर्यनारायणाचे पूजन करण्यात येते. यादिवशी सूर्योपासना करून सूर्याचे जे अनन्य साधारण महत्व आपल्या जीवनात आहे, त्याची आठवण करून सूर्यनारायणासमोर नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते त्या प्रकाशाची, त्या भास्कराची आज रोजी पूजा केली जाते.

माघ महिन्यात शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी या दिवशीच ‘जागतिक सूर्यनमस्कार (Surya Namaskar) दिवस’ संपूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो. यानिमित्त सर्वांग सुंदर असा व्यायाम असलेला सूर्यनमस्कार घालण्याची प्रेरणा मिळते. सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत. शिवाय हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे.

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्ऱ्यं नोपजायते ।।

अर्थात, जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्र्य येत नाही, तो साधक आरोग्य संपन्न जीवन जगतो. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या समयी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो.

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायाम बहुगुणी आहे. सूर्यनमस्कार यात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे. ते बारा पवित्रे असे आहेत. यात आसन म्हणून प्रणामासन किंवा नमस्कारासन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन, अश्वआसंचालनासन, पर्वतासन, अष्टांगभु नमस्कार, भुजंगासन, पर्वतासन, अश्वेसंचालनासन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन आणि प्रणामासन आदी आसन यात अंतर्भूत आहेत.

सूर्यनमस्कार घालतांना घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ॐ ह्रां मित्राय नमः’आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालावे. ॐ ह्रां मित्राय नमः, ॐ ह्रीं रवये नमः, ॐ हृं सूर्याय नमः, ॐ ह्रें भानवे नमः, ॐ ह्रों खगाय नमः, ॐ हृं पूष्णे नमः, ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः, ॐ ह्रीं मरीचये नमः, ॐ हृं आदित्याय नमः, ॐ ह्रें सवित्रे नमः, ॐ ह्रों अर्काय नमः, ॐ हृं भास्कराय नमः, ॐ श्री सवित्रे सुर्यनारायणाय नमः ही सूर्याची बारा नावांचे मंत्र आहेत. या मंत्रांच्या उच्चारणाने सूर्याची शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा आकृष्ट करण्याची शक्ती आहे. सूर्याच्या ही सकारात्मक ऊर्जा मानवी शरीरात संचारित होऊन मनुष्याचे शरीर सूर्याप्रमाणे तेजमान होते.

जगन्मित्र, सर्वांना पूजनीय, प्रवर्तक, संचालक, तेज देणारा, आकाशातून हिंडणारा, समस्त प्राणीमात्रांचे पोषण करणारा, ज्याच्या पोटात तेज आहे असा, सर्व रोगनाशक, सर्वाकर्षक, सर्व उत्पादक, आदरणीय, स्वयं प्रकाशमान असे अर्थ वरील बीजमंत्रांचे आहेत. सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. अष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासून सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. घेरंड संहितेमध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे.

सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थॉयरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा मोठ्या प्रमाणात संचार होतो.

व्यक्तीच्या शरीरातील त्रिदोष (वात, पित्त आणि कफ), अग्नी (भूक), सप्तधातू (रस, रक्त, मास, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र), मल (मुत्र, पुरिष आणि श्वेत) हे साम्य अवस्थेत असतील तर आत्मा, मन आणि इंद्रिये हे प्रसन्न असतात. म्हणजे ज्ञान ग्रहण करण्यास समर्थ असतात. यासाठी सूर्यनमस्कार सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. अशा आदी देव सूर्यनारायणास कोटी कोटी प्रणाम..

कृणाल दिलीप महाजन
सहायक प्राध्यापक
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक
९२०९२५०५५५

Leave A Reply

Your email address will not be published.