प्रबोधन आणि परिवर्तनाचा ठसा उमटलेल्या वैचारिक कवितांचा संग्रह- ‘‘लोकशाही’’

0

लोकशाही विशेष लेख

‘शब्द माझे बारुद झाले आहेत
जातीच्या उतरंडीला सुरुंग लावण्यासाठी
जाती जातीच्या कोंडवाड्यात अडकून पडलेल्या
माणसा माणसाला मुक्त करण्यासाठी’

अहमदपुर येथील साहित्यिक एन. डी. राठोड (N. D. Rathod) यांच्या ‘‘लोकशाही’’ या काव्यसंग्रहातील कवितेच्या या ओळी. या संग्रहाचे प्रकाशन 2022 या वर्षी नांदेड येथील ‘शब्ददान प्रकाशन’ – यांनी केले आहे. प्रबोधन आणि परिवर्तनाचा ठसा उमटलेल्या बारुद झालेल्या शब्दांचा ‘लोकशाही’ हा वैचारिक कविता संग्रह आहे.

कवी राठोड हे ते चळवळीतले कार्यकर्ते आहेत. मागील काही वर्षापासून ते परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांना जे बरे-वाईट अनुभव आले, त्या अनुभवाच्या माध्यमातून प्रबोधन आणि परिवर्तनाचा ठसा त्यांच्या मनावर उमटला. परिवर्तनवादी महापुरुषांचे विचार त्यांच्या अंगात रुजले आणि त्यातूनच समाजाच्या सुख दुःखाची जाणीव झाली. त्याचं प्रकटीकरण या ‘लोकशाही’ काव्यसंग्रहातील शब्दाशब्दात आहे. म्हणूनच कवीचे शब्द बारुद झाले आहेत, शब्द रोटी झाले आहेत, दिशाहिन समाजाला दिशा दाखविण्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी हुंकार होणार आहेत. असा आत्मविश्वास कवीला वाटतोय.

एकूण 30 कवितांचा हा काव्यसंग्रह आहे. यातील काही कविता विविध प्रतिनिधीक काव्यसंग्रहातुन वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेतच; पण या कविता काव्यसंग्रहात एकत्रित वाचतांना ‘लोकशाहीची नितीमूल्ये’ मनावर सहजतेने बिंबवितात. बहुजनांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना हा कवितासंग्रह अर्पण करण्यात आलेला आहे.

या संग्रहामध्ये लोकशाही, क्रांतीसुर्य, भूकंप, असत्य, युद्ध नको, स्वातंत्र्य, समाजसेवा, वसंतराव नाईक, महात्मा फुले, माझा भारत देश महान, मी कोण?, मोसमाची पाखरं, शब्द, उपकाराची परतफेड करणारे अण्णाभाऊ, येरे येरे पैसा, सावित्री, बस स्थानकातला वेडा, गुरुजी, देशभक्त अण्णाभाऊ, माय, माझा बाप, माझ्या गावचा शेतकरी राजा, पैसा, नारे, भ्रष्टाचाराचे भूत वनमाऊली, बाचं माहेर, वाघासारखा बाप माझा, सखू पळाली माहेरा व झोंबी या कविता आहेत. संग्रहातील या कविता माणसाच्या विचाराला चालना देतात. यात व्यक्तींच्या कार्याचा उल्लेख आहे. कवी चळवळीतले कार्यकर्ता असल्याने व शासनाच्या ग्रामविकास विभागात कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी लोकांचे दुःख जवळून बघितले आहे. लोकांसाठी काय करता येईल, ही तळमळ एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून एन. डी. राठोड यांच्या मनामध्ये आहे.

या कविता, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसंतरावजी नाईक, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रबोधन व परिवर्तनाच्या प्रेरक कार्याची यांच्या कार्याची दखल घेतात.
‘लोकशाही’त काय करायला पाहिजे आणि आज काय होतंय हे सांगताना ती कवी म्हणतो,

‘ते आहेत महात्मा गांधींचे चेले
आणि सर्वात अगोदर बघा तेच किल्लेदार झाले’.

लोकशाही मूल्याचं जतन आणि संवर्धन करत असताना विकासाचा रथ हा कोणाकडे जायला पाहिजे, तो जात नाही ती विषमता दिसते आणि त्या विषमतेतूनच कवी हळहळतो आणि मधूनच मग शब्दाने भूकंप करतो अन नव्या जगासाठी आशादायी होतो.

‘कशी होईल उद्या
आमच्या भविष्याची वाट
आज उद्या काळाची
पडेलच की गाठ..
नाही तर दे एकदा
झिडकारुनच सारे
अन वाहु दे जोमाने
मग नव्या जगाचे वारे’

जाणीवांच प्रकटीकरण, वेदना संवेदना यातून कवी तांड्यात सुद्धा फिरून येतो. भटक्या लोकांच दुःख मांडतो. शेतीशी नाळ जोडून, माय बापाच्या भावनांना जगासमोर आणत तांड्याची वेदना सांगतो.

‘अनेक संकटे झेलत
तांडा उभा माळरानी
बाप सांगतो कधी
आमच्या जीवनाची कहाणी’

माय कवितेत, आई व तांडा एकरूप होतांना दिसतात.

‘बकाल तांड्याचं दुःख
मायच्या चेह-यावर‌‍ दिसे
उपाशी लेकरांसाठी माय
वाही कष्टाचे ओझे..

कवितेतून समस्त मानवी जीवनाचा, वेदनेचा स्पर्श जाणवतो.

आपला देश युवाशक्तीच्या सामर्थ्याने प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करणार हा आशावाद निर्माण करत कवी म्हणतो,

‘युवा शक्तीचा वापर करा
वाहू द्या विकासाचा झरा
देश होईल सुजलाम सारा
जगाच्या शिरपेचात मानाचा तुरा’

यासाठीच ‘जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा’ असचं कवीला वाटत आहे. यासाठीच ‘समजसेवेच्या’ नावाने पावलोपावली होणारी फसवेगिरी पासून सावध राहण्याचा सल्ला ‘लोकशाही’ मधील कविता देते.

एकनाथ ल. गोफणे
चाळीसगाव
मो. नं. : 8275725423

Leave A Reply

Your email address will not be published.