बदलत्या हवामानाचा परिणाम ! राज्यात फक्त २८ टक्के जलसाठा; पाणीटंचाईचे संकट भीषण

0

लोकशाही विशेष लेख 

उन्हाचे चटके चोहोबाजूंनी जाणवू लागले असतानाच राज्यात लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पात एप्रिलमध्ये ३८ टक्के जलसाठा होता आणि आता आणखी कमी होऊन केवळ २८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाणी टंचाईच्या झळा सर्वत्रच जाणवू लागल्याने राज्यातील २ हजार ३४४ गावात आणि ५ हजार ६०५ वाड्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे यावर्षी पाणीप्रश्न अत्यंत गंभीर होण्याचा धोका व्यक्त होत आहे. येत्या काळात उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याची भिषण टंचाई निर्माण होवू शकते याला नाकारता येत नाही. राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टॅंकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सध्याच्या परीस्थितीत राज्यातील धरणांची स्थिती अत्यंत गंभीर आहे.

अमरावती ४३.८४ टक्के,कोकण ४२.१२टक्के, नागपूर ४०.४३टक्के,नाशिक ३०.६५ टक्के, पुणे २३.६९ टक्के, मराठवाडा १३.४० टक्के, संभाजीनगर ११.८९ टक्के यावरून स्पष्ट होते की पाण्याच्या बाबतीत संभाजीनगर , मराठवाडा व पुणे अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याने तीव्र पाणी टंचाई दिसून येते.कारण राज्यातील २ हजार ९९४ प्रकल्पांची एकुण क्षमता ४० हजार ४८५ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पामध्ये फक्त १५ हजार १८९ दशलक्ष घनमीटर पाणी साठा उरला आहे. म्हणजेच दिवसेंदिवस पाण्याची समस्या आणखीनच बिकट होण्याची शक्यता दिसत आहे.सध्या राज्यातील १८ ते २० धरणे कोरडी पडली आहेत.त्यामुळे येत्या काळात राज्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चिन्ह जवळपास निश्चित आहे.यावर्षी बदलत्या हवामानामुळे नेहमीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उष्णतेच्या लाटे सोबतच पाण्याच्याही हाहाःकाराला आतापासूनच सुरूवात झाली आहे.

दरवर्षी पावसाची कृपादृष्टी असणारा पश्चिम महाराष्ट्र यंदा पाण्यासाठी तडफडतो आहे. त्यामुळे आतापासूनच टॅंकरग्रस्त झाला आहे.पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे, सातारा, सांगली, आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे ३३४ गावातील ६ लाख ७२ हजार ८०७ नागरिकांना ३६४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.यावरून स्पष्ट होते की संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची टंचाई भेडसावणार आहे. याचे प्रायचित्य मानव, पशुपक्षी, संपूर्ण जीवजंतू,जंगल संपदा यांना आतापासूनच भोगावे लागत आहे.अजुन पावसाळ्याला दोन महिने बाकी आहे.राज्यासह देशातील जलाशय साठा निम्म्यावर आलेला आहे तर दुसरीकडे सुर्य आग ओकत आहे म्हणजेच पाण्याची समस्या आणि सुर्याचे आक्राळ विक्राळ रूप आणि जलसाठा कमी होणे यामध्ये पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टीला यावर्षी अत्यंत कठीणाईचा सामना करावा लागण्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील बदलत्या हवामानामुळे सर्वत्र उष्णतेची लाट तर कधी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे संपूर्ण जीवसृष्टी मानव, पशुपक्षी यांचे जीवन विस्कळीत होतांना दिसते तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस अत्यंत बिकट होतांना दिसत आहे.

विदर्भात नागपूर, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर येथे उष्णतेची लाट कायम आहे तर मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर येथे उकाडा वाढला आहे.म्हणजेच सुर्याने आपले उग्र रूप कळत न कळत सर्वत्र पसरविले आहे.त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या बाबतीत एलो अलर्ट घोषित केले आहे.अकोला ४४.३० अंश सेल्सिअस,सोलापुरचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४०.८ अंश सेल्सिअस, वाशिम ४३ अंश सेल्सिअस, यवतमाळ ४२.२ अंश सेल्सिअस, नागपूर ४१.५ विदर्भातील सरासरी तापमान ४२ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसची नोंद झाली.यावरून स्पष्ट होते की दिवसा तर उकाडा वाढलाच परंतु रात्रीही उकाड्याचे चटके संपूर्ण महाराष्ट्राला सहन करावे लागत आहे.हवामान खात्याने असेही वर्तविले आहे की मे ते जून महिन्यात देशातील अनेक भागातील उन्हाची झळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारे दोन महिने सर्वांनीच आपापली काळजी घेणे गरजेचे आहे.राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात सुर्य आग ओकतांना दिसतो आणि हा संपूर्ण प्रकार दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेला आहे.गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल,पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा आणि रायलसीमा येथे कमाल तापमान ४४ ते ४७ अंश सेल्सिअसच्या आसपास रहाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.यावर्षी वेळेच्या आधीच सुर्याने आक्राळ – विक्राळ रूप धारण केल्याचे दिसून येते आणि पुढे आणखी भयानक स्थिती निर्माण होवू शकते याला नाकारता येत नाही.कारण आतापासुनच नदी, तलाव, विहिरी, धरणे यांच्या पाण्याची पातळी कमी कमी होत आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशासह संपूर्ण जगात आपल्याला पहायला मिळेल.

आतापासुनच महाराष्ट्रात तापमानाचा पारा सिमापार करून पुढील काही दिवसांत कठीण परिस्थितीत निर्माण करण्याची भीती वर्तवली जात आहे.कारण मानवाने केलेला निसर्गाचा ह्यास यामुळेच आज आपल्याला उन्हाचे चटके व पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे मानवाने केलेल्या पापाचे प्रायश्चित्त मानव तर भोगतच आहे सोबतच पशुपक्षी, संपूर्ण जीवसृष्टी, पृथ्वी, आकाश-पाताळ,नदी-नाले,तलाव, धरणे, विहिरी यांनाही भोगावे लागत आहे.कारण राज्यासह देशातील वाढते तापमान हे दिवसेंदिवस निसर्गावर सरळ प्रहार करीत असुन संपूर्ण निसर्गाचे संतुलन ढासळत आहे त्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी वाढत्या तापमानापासुन स्वतःला सांभाळणे गरजेचे आहे.बदलत्या हवामानामुळे यावर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे आतापासूनच राज्यातील अनेक भागात आपल्याला भिषण पाणी टंचाई दिसून येत आहे.

जलाशयामध्ये फक्त २८ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.म्हणजे एकीकडे तापमानात वाढ यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम,तर दुसरीकडे पाणी टंचाई अशा डबल गंभीर समस्यांशी आपणा सर्वांना झुंज द्यावी लागणार आहे.वाढत्या तापमानामुळे उष्णतेची व अवकाळी पावसाचे बादल महाराष्ट्रासह अनेक राज्यात दिसून येते.राज्यात वाढते तापमान पहाता आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन सुध्दा केले आहे.वाढत्या उष्णतामानामुळे उन्हात फिरल्याने डोके दुखी,ताप येणे, जास्त घाम येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशा पध्दतीची साधारणतः उष्माघाताची लक्षणे जाणवू शकतात.यावर प्राथमिक उपाय म्हणून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.सावलीचा सहारा घेणे, थंड पेय घेणे,नारळाचे पाणी पिणे, पाणी भरपूर पिणे साधारणतः बाहेर निघताना कॉटनचे सैल कपडे घालावेत आणि जास्तच अस्वस्थ वाटत असेल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.परंतु आज वाढत्या तापमानामुळे पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आपापल्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था केली पाहिजे व पशुपक्षांना वाढत्या तापमानापासुन दिलासा दिला पाहिजे.बदलते हवामान, पाणी साठा कमी होणे,अती उष्णता, अवकाळी पाऊस याला रोखण्यासाठी राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवे.यामुळे वातावरणात आमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येईल व निसर्ग प्रफुल्लित राहील.

लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर
मो.नं. ९९२१६९०७७९

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.