कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पुलावर चढून गोंधळ घातला. या व्यक्तीच्या कृत्याने पोलिसांना अक्षरशः घाम फुटला. तो पुलावरून खाली उतरायला तयार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला नोकरीचे आणि बिर्याणीचे पाकीट देण्याचे आमिष दाखवून खाली उतरवले.
या घटनेमुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती
ही घटना सोमवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कराया पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्या व्यक्तीला पुलावरून खाली उतरवले. या घटनेमुळे शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती. पोलिसांनी सांगितले की, या भागातील 40 वर्षीय रहिवासी म्हणून या व्यक्तीची ओळख पटली आहे. हा व्यक्ती जो पत्नीपासून विभक्त झाला आहे, आणि व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे तणावाखाली होता. याला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटली. तो माणूस आत्महत्या करण्यासाठी पुलावर चढला होता.
कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी हा माणूस आपल्या मुलीला दुचाकीवरून सायन्स सिटीकडे घेऊन जात होता. दुपारी अडीचच्या सुमारास ते अचानक एका पुलाजवळ थांबले. त्यांचा मोबाईल रस्त्यात कुठेतरी पडल्याचे त्यांच्या मुलीला सांगितले. आणि मोबाईल शोधण्यासाठी जात असल्याचे सांगत त्याने मुलीला रस्त्यात उभे केले आणि पुलावर चढला. रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाहून तो खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला. या व्यक्तीच्या कृत्याची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीशी बोलणे सुरू केले. पण त्याला ते मान्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुलीशी चर्चा केली. मुलीने सांगितले की तिचे वडील डिप्रेशनमध्ये आहेत आणि तिची आई देखील तिच्या वडिलांना सोडून गेली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बिर्याणी आणि नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर ती व्यक्ती पुलावरून खाली आली.