जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित करण्यासाठी जळगाव जिल्हा नियोजन समितीने ३ कोटी ६६ लाख ७१ हजार ९६० रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. अशी माहिती कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी विद्यापीठाने मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने याबाबतीत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाला सर्वेक्षण व अंदाजपत्रकाचे निर्देश दिले. महाऊर्जाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी तातडीने हालचाली करून सर्वेक्षण तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्या नंतर जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशिर्पात असलेल्या अपारंपरीक ऊर्जा विकास अनुदान योजनेतून हे अनुदान देण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. कॅपेक्स मोड (भांडवली खर्चाचे मॉडेल) पध्दती अंतर्गत ६५० किला वॅट क्षमता असलेला पारेषण संलग्र सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित केला जाणार आहे.
प्रस्ताव सादर केल्या नंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या आत प्रशासकीय मान्यता देण्यात आली हे विशेष. या प्रकल्पामुळे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. सद्या विद्यापीठाला सुमारे २ हजार किलो वॅट चा मंजूर अधिभार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर किमान एक तृतीयांश वीजेची बचत होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत हा प्रकल्प कार्यान्वीत केला जाणार आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल. अशी माहिती कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी दिली.
ऑफलाईन मात्र बहुपर्यायी पध्दतीने परीक्षा होणार
गेल्या दोन वर्षापासून कोविड- १९ च्या महामारी मुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत होत्या मात्र सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑफलाईन घेण्याचा निर्णय आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे प्रा.माहेश्वरी यांनी सांगीतले. विद्यापीठाव्दारे घेण्यात येणाऱ्या उन्हाळी २०२२ च्या लेखी परीक्षाबहुपर्यायी (MCQ) स्वरुपात ऑफलाईन पध्दतीने विद्यापीठाने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील. पदवीस्तरावर ६० गुणांची ही परीक्षा १० मिनीटांची असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील व सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असेल. पदव्युत्तर स्तरावर ६० गुणांची परीक्षा १२० मिनिटांची प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील व सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असेल.
या परीक्षेकरीता निगेटीव्ह मार्किंग लागू राहणार नाही. बहिस्थ अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची परीक्षा १०० गुणांची व १२० मिनीटांची असेल. एकूण ५० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ गुण राहतील. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा प्रचलित पध्दतीने ऑफलाईन घेण्यात येतील. प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षांचे आयोजन हे प्रचलित पध्दतीने ऑफलाईन करण्यात येईल. अंतर्गत परीक्षा या देखील प्रचलित पद्धतीने शक्यतो दीर्घोत्तरी घेण्यात येतील. पुढील वर्षाच्या म्हणजे २०२२-२३ मधील हिवाळी व उन्हाळी परीक्षा या पूर्वीच्या प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी घेण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.
पुढील महिन्यात युवारंग युवक महोत्सव
कोविड- १९ मुळे विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव होऊ शकला नाही. मात्र या वर्षी हा युवक महोत्सव घेण्याचा निर्णय झाला आहे. काल २२ मार्च रोजी अंतरमहाविद्यालय युवक महोत्सव युवारंग २०२१ च्या आयोजनासाठी समितीची बैठक झाली. त्यामध्ये पुज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शहादा यांनी दिलेल्या संयुक्त प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आणि दि.१८ ते २१ एप्रिल, २०२२ या कालावधीत शहादा येथील पुज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात हा महोत्सव घेण्याचा निर्णय झाला आहे. असे कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी यावेळी सांगितले.
That is not fair take our exam as it will be conducted in finals.