जळगाव ;- भुसावळातील साकेगाव येथून झोक्यातून आठ महिन्यांच्या चिमुकल्याल अल्पवयीन मुलांसह सराईत गुन्हेगारांच्या मदतीने पळवून नेत त्याची मुंबई येथे ३ लाख ८० हजारात विकल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना पोलीस मागावर असल्याची जाणीव झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या प्रेयसीने ते बाळ अनाथ आश्रमात आणून ठेवले, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या घटनेचा उलगडा केला असून पोलिसांनी महिलेसह पाच जणांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे उपस्थित होते.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका घरातून २३ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास झोक्यात झोपलेल्या आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण केले होते. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ तालुका पोलिसांकडून केला जात होता. पोलिसांचे वेगवेगळ पथक तयार करुन या गुन्ह्याचा चारही बाजूने तपास करीत होते. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील नारायण नगरातील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन ट्रस्टतर्फे चालविल्या जाणाऱ्या अनाथ आश्रमावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये अपहरण झालेले आठ महिन्याचे बाळ मिळून आल्यानंतर पोलिसांनी ते बाळ ताब्यात घेत त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.
बाळ आठ महिन्याच्या बाळाच्या अपहरणाचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात होता. पोलीस आपल्या मागावर असल्याची कणकण लागताच अपहरणकत्या महिलेने मुंबईत विकलेले बाळ पुन्हा भुसावळात आणूने ते अनाथ आश्रमात ठेवले. मात्र तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केल्यानंतर या संपुर्ण घटनेचे बिंग फुटले.
नोंदणी अपहरण केलेले बाळ आढळून आलेल्या अनाथाश्रमाची धर्मादाय आयुक्तांकडे २०२२ मध्ये नोंदणी केली. आहे. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या विषयी धर्मादाय आयुक्तांना या प्रकरणाविषयी महिती देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पथकाची कारवाई ही कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील सहाय्यक फौजदार विठ्ठल फुसे, पोहेकॉ युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मिक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, संजय तायडे, पोलिस नाईक नितीन चौधरी, जगदीश भोई, राहुल महाजन, सहाय्यक फौजदार सादीक शेख, पोहेकॉ उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल भोई, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांनी कारवाई केली आहे.
मुंबई येथील महिलेला आपत्य दत्तक घ्यायचे असल्याने तीने अनाथ आश्रमाची प्रमुख असलेली रिना कदम हीच्यासोबत संपर्क साधला, त्या महिलेने बाळाच्या मोबदल्यात रिना कदम हीला पैसे देखील देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार मुख्य सूत्रधार असलेल्या कदम हीने दोन अल्पवयीन मुलांसह इतर साथीदारांच्या मदतीने साकेगावातून आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण केले. त्यानंतर नंदुरबार पोलिस दलातील बाळू इंगळे याच्या मदतीने ते बाळ मुंबई येथे संबंधित महिलेकडे सुपुर्द करण्यात आले. त्यापोटी रीना कदम हिने सुमारे ३ लाख ८० हजार रुपये देखील घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
या घटनेत मुख्य सूत्रधार अनाथ आश्रम चालविणारी महिला, रिना राजेंद्र कदम (४८, रा. नारायण नगर, भुसावळ) ही आहे. तिच्यासोबत या गुन्ह्यात पोलिसांनी दीपक रमेश परदेशी (वय ३२, रा. नारायण नगर, भुसावळ), अमीत नारायण परिहार (वय ३०, रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ), कुणाल बाळू वाघ (वय १९, रा. साकेगाव, ता. भुसावळ), बाळू पांडूरंग इंगळे (वय ५१, रा. वरणगाव, ता. भुसावळ) या पाच जणांना अटक करण्यात आले आहे. या शिवाय अजून एका जणाचा शोध सुरू असून दोन अल्पवयीन मुलांचाही यात समावेश असल्याचे समोर आले आहे.
बाळाचे अपहरण केल्यानंतर त्या बाळाला मुंबई येथे घेवून जातांना रिना कदम हिच्यासोबत नंदूरबार पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागातील पोलीस हवालदार बाळू इंगळे सोबत होता. पोलिसांनी त्याला देखील अटक केली असून त्याचा अहवाल नंदूरबार पोलीस अधीक्षकांकडे पाठविला जाणार आहे. तसेच अटकेत असलेले अन्य संशयितांवर खून, खंडणी, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, आर्म अॅक्ट व इतर प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.