ST चा संप जीवावर बेतला; रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीचा करुण अंत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

१७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धावत्या रिक्षातून तोल जावून खाली पडलेल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात घडली आहे.

तृप्ती भगवान चौधरी (वय १७) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने प्रवास करत होती. मात्र हाच प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला. तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न. ह. रांका महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेचं शिक्षण घेत होती.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने रिक्षांमध्ये जास्तीचे प्रवासी भरून अवैध वाहतूक केली जातेय. यामुळे अनेक अपघात होत आहेत. तृप्ती देखील रिक्षानेच महाविद्यालयात ये-जा करत होती. कॉलेजची वेळ सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे गुरुवारी महाविद्यालयात आली. कॉलेज सुटल्यानंतर ती मैत्रिणींसोबत शेलवड येथे जाण्यासाठी निघाली. यावेळी तृप्ती रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली. प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोघीही खाली पडल्या.

दरम्यान तृप्ती बाहेरच्या बाजूने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ. यशपाल बडगुजर यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला जळगावला हलवण्याचा सल्ला दिला.

परंतु जळगावला नेत असताना वाटेतच तृप्तीने आपले प्राण सोडले. जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन त्यानंतर दुपारी ४ वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

..तर माझी मुलगी वाचली असती

यावेळी तृप्तीच्या वडिलांनी दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी तालुक्यात एसटी बसच्या दिवसभरातून २१ फेऱ्या होत होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी एसटीचा संप सुरू झाला.यामुळे सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहने चालवतात. तृप्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज एसटी बस सुरू असत्या तर माझ्या मुलीचा जीव वाचला असता’.

 

Leave A Reply

Your email address will not be published.