जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना (Corona) वेळी जिल्ह्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली होती. त्याचा फायदा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांनी उचलला होता. विशेषतः अशिक्षित जनतेचा गैरफायदा घेत या बोगस डॉक्टरांनी कोरोना काळात आपली पोळी भाजून घेतली. आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने तालुक्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या पाहिजे. दरम्यान, बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्यासाठी नियुक्त असलेली समिती केवळ कागदावरच असल्याचे दिसून येऊ लागले आहे. परिणामी अनेक निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.
जिल्ह्यात आरोग्य सेवा न पोहोचलेल्या दुर्गम भागात प्रामुख्याने या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. बनावट डिग्रीच्या आधारे तात्पुरता दवाखाना सुरू करून स्वस्तात उपचार करण्याचे आमिष त्यांच्याकडून दाखविले जाते. सर्दी, खोकला, तापावर औषधी दुकानात मिळणाऱ्या गोळ्या औषधांचा वापर करून या डॉक्टरांकडून उपचार केला जातो. त्यात रोगाचे निदान होत नसल्याने अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.बोगस डॉक्टरकडून कोणत्याही आजारावर एकच उपचार पद्धत सुरू असल्याने किरकोळ आजारी असलेले रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य विभागाकडून या बोगस डॉक्टरांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.