जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील छत्रपती शिवाजीनगर पुलाच्या समांतर रस्त्याचे काम पुलाच्या मक्तेदाराकडेच आहे. शिवाजीनगरातील पुलाच्या दोन्ही बाजूचे व टॉवरकडील पुलाच्या दोन्ही बाजूचे समांतर रस्ते मक्तेदाराने करावयाचे आहेत. मक्तेदाराने या रस्त्याचे काम केले. मात्र, त्या रस्त्यावर केवळ खडी टाकून डांबरीकरण केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजीनगर पुलाच्या (Bridge) दोन्ही बाजूला असलेल्या समांतर रस्त्याच्या कामाबाबत महापालिकेने मक्तेदाराला तीन स्मरणपत्रे दिल्यानंतरही त्याचे काम झाले नसल्याची तक्रार मनपा शहर अभियंत्यांनी केली आहे.
रस्त्यावर खडी आणि डांबर टाकून तब्बल तीन महिने झाले आहेत. त्यावर अद्यापही सीलकोट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता रस्त्यावरची खडी उखडत असून, वाहतुकीला अडथळा येत आहे. परिणामी, या रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. नागरिकांनी या रस्त्याचा वापरही कमी केला असल्याचे सागंण्यात येत आहे. अनेकजण दुसऱ्या मार्गाने येत आहेत.