हिंदु जनजागृती समितीचा जळगावात ‘हिंदूसंघटन मेळावा’ संपन्न !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अनादी अनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्व काळी भारतात ५६६ राजसंस्थाने होती. वर्ष १९५० ला आपण संविधानाचा स्वीकार केला. १९७६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने ४२ वी घटनादुरुस्ती करून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घुसडले. भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गाने विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले. ते जळगाव येथील ला. ना. हायस्कुलमधील भैय्यासाहेब गंधे सभागृहात २ ऑक्टोबर या दिवशी आयोजित ‘हिंदूसंघटन मेळावा’ प्रसंगी बोलत होते. मेळाव्याला ह.भ.प.राजीवजी झा महाराज, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनीदेखील संबोधित केले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला जळगावसह जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने मेळाव्यास प्रारंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या गेल्या २० वर्षांतील कार्याचा परिचय आणि स्वसंरक्षक प्रात्यक्षिकांच्या ध्वनिचित्रफिती दाखवण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.