लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचं संकट कधीदूर होईल, याची सर्वच जण वाट पाहत आहे, तर दुसरीकडे शेकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खरीप तसेच रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कुठे होणार पाऊस?
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकता. उर्वरित ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहील. पुढील २४ तासात मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात ढगांच्या गटगडाटासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील, अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात २-३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.