राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सध्या सर्वत्र लग्न समारंभाची एकच भाऊगर्दी दिसत आहे. आज या नातेवाईकाचे, मग त्या मित्राचे वगैरे वगैरे… आणि लग्न म्हटलं कि रीतीरिवाज आणि तयारीची गडबड असते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जेमतेम गुलाबजाम न मिळाल्यानेही वाद आपल्याला लग्नात पाहायला मिळाले आहेत. असाच काहीसा प्रकार राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे एका नवरदेवाला भर मंडपात नवरीकडील मंडळींनी चांगलाच चोप दिलाय. एवढच काय तर त्याला बांधूनही ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, १ मे रोजी नागलगावच्या लखन मीणा यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह दौसाच्या बेजुपाडा तालुक्यातील झुताहेडा स्थित विजेंद्र (२८) याच्याशी निश्चित झाला होता. दोन्ही गावं एकमेकांपासून केवळ ११ किमीच्या अंतरावर आहेत. सोमवारी रात्री ७ वाजता विजेंद्रच्या कुटुंबातील लोक वऱ्हाड घेऊन नागल गावात पोहोचले. रात्री ९ वाजता फेरे घेण्यात येणार होते. तत्पूर्वी मुलीकडच्या मंडळींना गावातून वरात काढण्याची सर्वच तयारी केली होती. त्यानुसार, नवरदेवाची वरातही निघाली. दरम्यान, रात्री ९ वाजता लग्नात फेरे होण्यापूर्वीच नवरेदवाने आपल्या मागण्यांची एक यादीच समोर मांडली, त्याने यावेळी पैशांसह बोलेरो गाडीची मागणी केली. तसेच, या दोन्ही गोष्टी मिळाल्या तरच आपण लग्नास तयार होणार, आणि फेरे घेणार असा हट्टच धरला.
नवरदेवाच्या अश्या वागण्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी नवरदेव विजेंद्र आणि त्याचे चुलते पप्पूलाल मणी यांची धुलाई केली. कपडेही फाडले. त्यामुळे, दोन्हीकडील लोकं आमने-सामने आले. लग्नमंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवरदेव व नवरदेवाच्या काकांनी धूम ठोकली. याप्रकरणी विजेंद्रच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे (Police) तक्रार केली. त्यावेळी, मुलीच्या मंडळींनी दोघांनाही बांधून ठेवलं होतं. अखेर, पोलिसांच्या मध्यस्तीने हा वाद मिटवण्यात आला.