जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली जवळ असलेले आडगाव येथे आज दि. ९ रोजी शिवाजी पंडितराव पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याने गोठ्यात असलेले शेती कामाचे साहित्य जाळले तर गोठ्यात बांधलेल्या सात गुरांपैकी दोन गुरांचा भाजल्याने जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५ गुरे भाजून गंभीर जखमी झाले आहेत. वेळीच यावल अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवत पुढची हानी टाळली.
दि.९ मंगळवार रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घरासमोरील असलेल्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. गुरांच्या गोठ्यामध्ये शिवाजी पाटील यांचे शेती उपयोगी येणारे ५० नग दोन व अडीच इंची पीव्हीसी पाइप, ५० बंडल ठिबक सिंचन नळी , शेतीचे अवजारे , व इतर साहित्य, लाकडी दांड्या, सरे व लोखंडी पत्रे, आदि सामानासह १ पाच ते सहा वर्षांचा गो-हा, १ व्यायलेल्या गायीचा गंभीर भाजल्याने जागीच मृत्यू झाला. पाच गुरे गंभीर जखमी झाले असुन असे एकुण तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामा करण्यात आला आहे. सदर घटनास्थळी तलाठी यांनी पाहणी व पंचनामा करून तसा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.