गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सायकल यात्रेचा समारोप

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महात्मा गांधींनी आपल्या जीवनात समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले व तेच कार्य गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने काढलेल्या ग्राम संवाद सायकल यात्रेने केले आहे. सायकल यात्रा हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून यात्रेच्या संपर्कात येणाऱ्या व सहभागी असणाऱ्या सर्वांसाठी ती लाभदायक आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांची संख्या वाढली पाहिजे असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांनी केले. ग्राम संवाद सायकल यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई, प्रा. डॉ. अश्विन झाला व यात्रा समन्वयक गिरीश कुलकर्णी उपस्थितीत होते.

समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. के.बी. पाटील पुढे म्हणाले की, सध्या समाज माध्यमातून गांधीजींबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. सायकल यात्रेने याबाबत केलेली जागरूकता महत्वाची ठरते. सर्व सायकल यात्रींचे त्यांनी अभिनंदन केले व आपण केलेले कार्य नक्कीच परिवर्तन घडवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात अरमान आंगरा यांच्या प्रार्थना व भजनाने झाली. त्यानंतर सायकल यात्रेचे सादरीकरण करण्यात आले. सायकल यात्रेत सुरेश पाटील, विश्वजीत पाटील, श्रीराम खलसे, मारिया सिसिलिया, विशाल टेकावडे, आकाश थिटे, सुभाष कासदेकर, अमनकुमार वर्मा, काळूभाई मायडा, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, भिका पाटील, धनराज पाटील, वाल्मिक सैंदाणे यांचा सहभाग होता.  यात्रेत सहभागींपैकी शिवाजी कोकणे, पार्थ सारथी, नीर झाला, राकेश शइकिया, शुभम पवार, डॉ. निर्मला झाला, मयूर गिरासे, आचल चौधरी यांनी अनुभव कथन केले. या यात्रेमुळे स्वतःशी, निसर्गाशी व जनतेशी संवाद साधता आला. खान्देशी लोकांचे प्रेम, येथील संस्कृती, आदरातिथ्य व खाद्य पदार्थ यांनी आम्हास आनंद दिल्याचेही त्यांनी म्हटले. व्यसनाधीनतेची वाढती समस्या तसेच शाळांमधील शिक्षण व स्वच्छता याबाबत विशेष कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अब्दुलभाई यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व सहभागींना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. डॉ. निर्मला झाला यांनी आभार मानले. गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, नितीन चोपडा, संतोष भिंताडे, हेमंत बेलसरे, चंद्रशेखर पाटील, अशोक चौधरी, तुषार बुंदे, योगेश संधानशीवे यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.