जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
तीन शेतकऱ्याचा ७७ क्विंटल कापूस खरेदी करून पैसे न देता परस्पर घेऊन एकूण ६ लाख २१ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथील उघड झाला आहे. याबाबत २८ मार्च रोजी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोंढ्री गावात शेतकरी संजय गबरू राठोड, सुरेश राघो चव्हाण आणि ललित सोमा चव्हाण यांची शेती असून त्यावरच तिघांच्या कुटुंबाची गुजराण चालते. २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता एका व्यापाऱ्याने या तीनही शेतकऱ्यांकडून ७७ क्विंटल कापूस याची रक्कम ६ लाख २१ हजार रुपये मोजून घेऊन पैसे न देता वाहन घेऊन प्रसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान तीनही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या संदर्भात संजय गबरू राठोड (वय-४२) रा. लोंढ्री ता. जामनेर यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.