बाप्पांच्या विसार्जना आधीच मुंबई जलमय…

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी सायंकाळी दमदार पाऊस कोसळल्यामुळे घरी जाणाऱ्या नोकरदारवर्गाचे हाल झाले होते. मागील चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, आज देखील ढगाळ वातावरण राहणार असून गडगडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने ऐन गणेशोत्सवात पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे.

आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली आहे. मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना फटका बसला आहे. लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार कळवा आणि मुंब्रा दरम्यान जलद मार्गावर पाणी साचल्याने त्या मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प आहे. मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना थेट नदीचं स्वरुप प्राप्त झालं. नदीच्या प्रवासारखं पाणी रस्त्यावर वाहताना दिसलं. पावसाचे अतिशय भयानक दृश्य देखील समोर आले आहेत. मुंब्र्यात पावसामुळे डोंगरावरील पाणी प्रचंड प्रवाहात शहरात आले आणि तेच पाणी ट्रॅकवर साचलं. यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. संध्याकाळी साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस मुंब्र्यात पडला. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. तर धीम्या मार्गावरही लोकल वाहतुक रखडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचले आहे.

वेळापत्रक कोलमडल्याने कल्याणच्या पुढे कर्जत-कसारा लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर उद्घोषणेचा अभाव असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुक काहीशा उशीराने पण सुरळीत सुरु आहे. गणपतीच्या काळात नेहमीपेक्षा जरा गर्दी कमी असली तरी ही कार्यालयहून परतण्याची वेळ असल्याने आणि त्यात लोकल सेवा रखडल्याने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.