मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये पुन्हा घरवापसी असून खडसे यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. या बातम्यांमुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. एकनाथ खडसे यांना राज्यपाल करु नये, अशी मागणी त्यांनी सहा पानी पत्रातून केली आहे. त्यात त्यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली असल्याने खडसेंच्या अडचणीत वाढ झालीय.
पत्रात काय आहे ?
अंजिल दमानिया यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्याची शिफारस आल्यास ती नाकारावी. यासंदर्भात अंजली दमानिया यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, घटनेच्या कलम 60 नुसार माननीय राष्ट्रपती संविधान आणि कायद्याचे जतन, संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करतील आणि ते स्वतःला सेवेसाठी समर्पित करतील अशी अपेक्षा आहे.
https://x.com/anjali_damania/status/1777627304547729811
तसेच अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे. नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.