मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक, अभिनेते, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे (Dr. Vishwas Mehendale) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव मुलुंड पूर्व इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.
दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसंच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते.
विश्वास मेहेंदळे यांनी पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम सुरू केले. मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी पाहिली. सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक होते. मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही ते बराच काळ कार्यरत होते. त्यांनी काही गाजलेल्या नाटकांमध्येही काम केलं होते. रंगभूमीवरचा त्यांचा वावर वाखाणण्याजोगा होता. मला भेटलेली माणसे हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. शिवाय दूरदर्शनवर असलेला वाद संवाद हा कार्यक्रम मेहेंदळे यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता. त्यांनी यशवंतराव ते विलासराव, आपले पंतप्रधान यासह 18 हून अधिक पुस्तकांचे लेखण केलं आहे.