बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क:
बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. सचिन येळे असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. सचिन आणि हर्षदा यांचा विवाह 19 तारखेला बारामती तालुक्यातील शारदा नगर येथे झाला होता. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशी नवरदेवाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हर्षदा पाचव्या दिवशी विधवा झाली आहे.
दोघांचा विवाह होऊन पाच दिवस झाले होते. घरातील पाहुणे मंडळी परतायचे होते. मंडपही जशासतसा उभा होता. मात्र नियतीने क्रूरतेचा कळस गाठला. संसार सुरु होण्याआधीच नवरी मुलगी विधवा झाली आणि लग्नाच्या मंडपातून नवरदेवाची पाचव्याच दिवशी तिरडी उठली. या घटनेमुळे गावात शांतता पसरली आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नवरीला मात्र पतीची तिरडी बघावी लागली आहे.
सचिन घरातील सगळ्यात लहान असल्याने त्याचा विवाह कुटुंबियांनी धुमधडाक्यात केला होता. लग्नात कसलीही कसर सोडली नव्हती. शारदानगर येथे लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी रीतीरिवाज तसेच विधीवत देवदर्शनासाठी नवदंपत्य नातेवाईकांसह सोमवारी घरी परतले होते. त्यानंतर पूजा झाली आणि त्याच पहाटे सचिनला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्वरीत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.