नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १५ ऑगस्ट रोजी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकाविला. , याआधी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर किमान दहा वेळा तिरंगा फडकविला आहे. हा मान मिळविणारे मोदी हे पहिलेच बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान ठरले.
आज भाषणाला सुरुवात करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आणि देशासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या सगळ्याच स्वातंत्र्य वीरांना नमन करुन देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच भारत आत्ता आपल्या अमृतकाळात आहे. जगासाठी भारत हा आशेचा किरण ठरतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आम्ही जेव्हा २०१४ मध्ये सत्तेत आलो, तेव्हा आपण जगात दहावी अर्थव्यवस्था होतो. आज आपण जगात पाचव्या स्थानी पोहोचलो आहोत. जेव्हा भ्रष्टाचाराचा राक्षस देशाच्या मानगुटीवर बसला होता, लाखो कोटींचे घोटाळे अर्थव्यवस्थेला हादरे देत होते, प्रशासकीय दिरंगाई देशाची ओळख झाली होती. आम्ही अर्थव्यवस्था सक्षम केली. गरीबांसाठी चांगल्या योजना आणल्या”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
सर्वच बाबतीत आधीपेक्षा अनेक पटींनी आपण निधी देत आहोत. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून माझ्या ५ वर्षांच्या कार्यकाळात साडेतेरा कोटी गरीब नवमध्यमवर्ग व मध्यमवर्गाच्या स्वरूपात वर आले आहेत”, असा दावा नरेंद्र मोदींनी यावेळी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात केला.