धरणगाव पालिका प्रशासन सुस्त ! चक्क काळ्या रंगाचा केला जातो पाणीपुरवठा

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सावरकरांनी काळया पाण्याच्या समुद्रात असलेल्या कारागृहाची शिक्षा भोगली होती. परंतु धरणगावकरांना मागील काही दिवसांपासून पिण्यासाठी चक्क ‘काळ्या पाण्या’ ची शिक्षा भोगावी लागत आहे. शहरात मागील काही दिवसांपासून चक्क गटारीसारखे काळे पाणी नळातून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

मुळात उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात भूगर्भातील पाण्यात बदल होत असल्याने अतिसार सारख्या साथीच्या आजारांची दाट शक्यता असते. त्यामुळे या दिवसात पाण्याच्या बाबतीत गांभीर्य राखून खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला असतात. परंतु येथील सर्वात संतापजनक व धक्कादायक प्रकार म्हणजे पालिका प्रशासानाकडून येथील काळया पाण्याच्या पुरवठ्याबाबत उत्तर देण्यासाठी कुणीही समोर आलेले नाहीय हे विशेष.

नगरपालिका प्रशासनावर प्रशासकीय राजवट असल्याने त्यांचेवर कुणाचाही वचक नसल्याने त्यांनी अक्षरश: निगरगट्ट धोरण अवलंबले असल्याची संतप्त भावना येथील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील हे तालुक्याचे शहर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ह्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना गृहीत धरले असल्याने त्यांचे कुठलेही नियंत्रण स्वतःच्या तालुक्यांतील अधिकाऱ्यांवर राहिलेले नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.

गोमातेच्या हक्काच्या गुरुचरण जमिनीच्या अतिक्रमण प्रकरणी अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देवुन आज बरेच महिने झाले तरी देखील येथील अधिकरिणी पालकमंत्र्यांची कुठलीही भिती न बाळगता हा विषय अजुनही दुर्लक्षित ठेवला आहे. यावरून येथील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरून “पाटील बुवाले जग भ्याये ! अन् घरणी लक्ष्मी अंगठा दाये ! या अहिरणातल्या म्हणीचा प्रत्यय येत असल्याची भावना धरणगावकरांमध्ये व्यक्त होत आहे.

शहरात काही दिवसांपासून पिवळसर रंगाचा दुषित पाणी पुरवठा होत होता. पाण्यातून दुर्गंधी देखील येत होती. परंतू आता चक्क गटारीसारखे काळ्या रंगाचे पाणी नळातून येत असल्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहे. कालपासून गावातील खत्री गल्ली, लहान माळी वाडा, मुख्य बाजारपेठ या परिसरात काळ्या रंगाच्या दुषित पाणी पुरवठा सुरु झाल्यामुळे सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या मनात मोठी चिंता निर्माण झाली आहे.

सोशल मीडियात व्हिडीओ टाकून पालिका प्रशासनावर नागरिकांची टीकेची झोड !

कालपासून चक्क गटारीसारखे काळे पाणी नळातून येत असल्यामुळे अनेक जण आपापल्या भागात येणारे गढूळ पाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियात टाकून संताप व्यक्त करत आहेत. काही जणांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत पालिका प्रशासनातील कोणताही जबाबदार अधिकारी, कर्मचारीने समोर येऊन काळ्या पाण्याचे कारण सांगितले नाही. नेमकी अडचण काय आहे ? दुषित पाणी पुरवठा का होतोय? याचे कारण कुणीही समोर येऊन सांगत नाहीय.

मागील आठ दिवसापासून होत असलेला दुर्गंधीयुक्त काळेकुट्ट पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. यामुळे जनतेच्या मनात तीव्र असंतोष असून तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा सुरु न झाल्यास पालिकेवर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शहरातील नागरिकांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून देत आहे.

-अॅड. संजय महाजन (जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी सेल)

Leave A Reply

Your email address will not be published.