राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क
राजस्थानमधून (Rajsthan) एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुख्याध्यापकाच्या माठातील पाणी प्यायल्याने एका दलित विद्यार्थ्याने (Dalit student) आपला जीव गमावला आहे. जालोर (Jalore) जिल्ह्याच्या सुराणा येथील सरस्वती विद्यालयात तिसरीत शिकणारा विद्यार्थी इंद्रकुमार मेघवालने शनिवारी अहमदाबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे. घटना २० जुलैची आहे.
विद्यार्थ्याच्या चुलत्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. काका किशोर मेघवाल यांच्यानुसार, आपल्या माठातील पाणी प्यायल्यामुळे छैल सिंह याने एवढा संताप व्यक्त केला की त्याने इंद्रकुमारला बेदम मारहाण केली. मुलगा घरी आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्याला उदयपूरमध्ये नेले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अहमदाबादमध्ये हलवण्यात आले. शनिवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.आरोपीला गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.
एमआरआयमध्ये इंद्रच्या कानाखाली गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. रुग्णालयाच्या एक व्हिडिओत तो बोलण्याच्या स्थितीतही दिसत नव्हता. कुटुंबीयांनी विचारल्यावर कानावर हात लावून तो मारहाणीचा इशारा करताना दिसतो. छैलसिंहचे नाव घेतल्यावर तो कानाला हात लावून मारल्याचे खुणावतो.