अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यात अवकाळी पावसाने रुद्रावतार दाखविल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल सकाळपासून अवकाळी पाऊस व गारपिठी ग्रस्त सर्व गावांना भेटी देवून संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाला संबंधित योग्य त्या कारवीच्या सूचना केल्या.
आमदार अनिल पाटील यांनी पाहणी करून महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त शेती, घरांची झालेली पडझड, जनावरे दगावल्याची शक्यता लक्षात घेता नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पावसामुळे ग्रामीण भागातिल रस्त्यांची झालेली दुर्दशा तसेच अनेक रस्त्यांवर उन्मळून पडलेली झाडे याअनुषंगाने झालेल्या रस्त्यांची तात्काळ डागडुजी करून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाऊस व गारपिटीने तालुक्यातील अनेक भागात विजेच्या तार खांबांची देखील पडझड झाली असल्याने विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे, महावितरणला या बाबत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना शासकीय मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर नुकसानी संदर्भात लवकरात लवकर अहवाल पाठविण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.