उदयपूर येथे अखिल भारतीय चितोडा वैश्य (वाणी) महासभेची बैठक संपन्न

0

उदयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय चित्तौडा वैश्य/ वाणी समाजाचे एकदिवशीय महासभेचे आयोजन उदयपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र महाजन (इंदौर) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. उदयपूरचे सचिव राजेंद्र अंतर्समान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उदयपूर शहराचा व चित्तोडा समाजाचा इतिहास सांगितला.

कार्यक्रमाची सुरुवात केसरीयाजी लाल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. व्यासपीठावर अध्यक्ष राजेंद्र महाजन (इंदौर), राष्ट्रीय महिला अध्यक्ष अंजली गडे (बुरहानपूर), राष्ट्रीय महासचिव शिवप्रसाद चित्तोडा (कोटा), संघटन सचिव विनोद अजनाडकर (जळगाव), सामाजिक कार्यकर्ते महावीर प्रसाद पटवा (उदयपूर), उदयपूरचे अध्यक्ष तसेच स्वागताध्यक्ष सुरेश पद्मामवत, विमलजी गुडीया, डॉ. शशी चित्तोडा (उदयपूर), ललिता मेहता (इंदोर) इ. उपस्थित होते.

यानंतर नवनित मंडळाचे सदस्य उषा आणि भावना यांनी नृत्य सादर केले. सदर महासभेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान येथून आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार उदयपूर वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेश पद्मामवत यांचे हस्ते करण्यात करण्यात येऊन त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

या महासभेत अखिल भारतीय चित्तोडा वैश्य महासभेची नोंदणी उदयपूर अथवा दिल्ली येथे करण्याचे निश्चित करण्यात आले. तिन्ही राज्यात व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक संबंध वृद्धिंगत करणे. रोटी बेटी व्यवहार वाढविणे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान या तिन्ही राज्यांनी देश विदेशातील व देशातील चित्तोडा समाजाची संपूर्ण जनगणना आक्टोंबर २०२३ पर्यंत करण्याचे नियोजन करण्याचे ठरले. महासभेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन दि. ७, ८ जानेवारी २०२३ रोजी इंदोर येथे घेण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी जाहीर करुन अधिवेशनाचे सर्व प्रकारचे दायित्व स्विकारण्याची हमी त्यांनी दिली.

राष्ट्रीय अधिवेशन दरवर्षी घेऊन सर्व राज्यांना संधी देण्याचे एकमताने निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय महासचिव शिवप्रसाद चित्तोडा यांनी स्थापन होत असलेल्या अखिल भारतीय चित्तौडा वैश्य महासभेच्या संविधानाबद्दल माहिती दिली. सदर महासभेत प्रत्येक राज्यातून दोन उपाध्यक्ष, सहसचिव, संघटन सचिव, महिला सहसचिव व इतर अकरा सदस्य यांची नावे निश्चित करण्यात येऊन संस्था स्थापनेची कार्यवाही करण्यात आली.  राष्ट्रीय महिला अध्यक्ष अंजली गडे (बुरहानपूर) यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वतंत्र वुमन फोरम तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

जळगाव येथून प्रा. उमेश देविदास वाणी,  विनोद अण्णा अजनाडकर (संघटन सचिव), महेश प्रभाकर अकोले (सावदा ), विवेक राजेंद्र वाणी (वरणगांव) इ. सहभागी झाले होते. याप्रसंगी विनोद अजनाडकर यांनी जळगांव येथे झालेल्या संमेलनाची माहिती व नियोजन प्रक्रिया, जनगणनेची तयारी याबद्दल सविस्तर माहिती दिली.  विनोद अजनाडकर यांचा शाल, शेला, स्मृती चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.  प्रा. उमेश वाणी, महेश अकोले, विवेक वाणी यांनी विविध सत्रातील चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. याप्रसंगी देशभरातून दोनशे व्यक्ती सहभागी झालेल्या होत्या. या महासभेच्या आयोजनासाठी उदयपूर येथील नवनित मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.