अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क
समृद्धी महामार्गावरची अपघाताची मालिका थांबायचं नाव काही घेत नाही आहे. आज पुन्हा समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या विकासाला सुस्साट वेग मिळाल्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात असलेला समृद्धी महामार्ग प्रत्यक्षात वाहतुकीच्या दृष्टीने मात्र असुरक्षित ठरत आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताने या महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. आशिष तिवारी असे मयत चालकाचे नाव आहे, तर संतोष केवट असे गंभीर जखमी वाहकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तातडीने त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.