लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई
आज सकाळी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चुराडा झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. शिलाटणे गावाजवल महामार्गावर ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली. कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला. यात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे.