आयशर -ट्रकचा भीषण अपघात, तीन ठार, एक गंभीर जखमी

0

 

मलकापूर;- भरघाव आयशर -ट्रकच्या भिषण अपघातात तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर तालसवाडा फाट्यानजीक ८ मार्च शुक्रवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आयशर क्र.एम.एच.१९/सी.एक्स. ०९७७ हि पाचोर्‍याची गाडी भुसावळ वरून अकोल्याकडे निघाली होती. राष्ट्रीय महामार्गावर तालसवाडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने भरघाव आलेल्या ट्रक क्र.एम.पी.१४/एच.सी.३७८६ या वाहनाची समोरासमोर भिषण धडक झाली. हा अपघात इतका भिषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचा अक्षरशः चुराडा झाला.

आयशर वाहक सचिन ज्ञानेश्वर पिलोरे (३२ रा.पतखडी (बेलदार वाडी) जळगांव खान्देश व ट्रकचालक रघुवीर सिंह (३९ पाटणीया) मध्यप्रदेश हे दोघे जागीच ठार झाले. तर अपघाती वाहनांमध्ये अडकलेल्या दोघांना क्रेनने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात गंभीर जखमींवर शर्थीचे उपचार करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुलढाणा व जळगाव खान्देश हलविण्यात आले. त्यापैकी समाधान यमराज पवार (३८ रा.लव्हारा) पाचोरा यांचा बुलढाणा नेत असतांना दाताळा नजीक मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी रामलाल मिना (४८ रा.पाटलीया) मध्यप्रदेश याला जळगाव खान्देशात हलविण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील तालसवाडा नजीक नळगंगा नदीतिरावरील नविन पुलाला भगदाड पडल्याने त्याला थिगळ लावण्याचे काम कासवगतीने गत काही दिवसांपासून सुरू होते त्यामुळे तालसवाडा ते दसरखेड दरम्यान वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे. मात्र तालसवाडा नजीक एकेरी वाहतूक संदर्भात फलक नसल्याने हा अपघात घडला .

संबंधित ठेकेदारच या अपघातास कारणीभूत असुन त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड हरीश रावळ, शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी केली आहे . हि घटना घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांची एकच गर्दी झाली. परिणामी चक्काजाम झाल्याने पश्चिमेस तालसवाडा ते दसरखेड व पूर्वेस तांदुळवाडी पूल ते धरणगांव पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिस व एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल दोन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.