पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकंही पडत असून या धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीला पुणे जिल्ह्यातील मंचर येथील जीवन मंगल कार्यालयासमोर भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीची पुढे चाललेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक बसून ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहे. यामधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. चालक पंकज खंडु जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी अहिरे (रा. जायखेडा तालुका सटाणा) अशी मृतांची नावे आहेत.
धुक्यांमुळे अपघात
आज पहाटे ५ वाजेच्या सुमाराड ही दोन्ही वाहने पुण्याच्या दिशेने चालली होती. मात्र, धुक्यामुळे क्रुझर वाहन चालकाला पुढे जात असलेला मालवाहू टेम्पो दिसला नाही. आणि भरधाव असलेली क्रुझर गाडी ही पुढे चाललेल्या मालवाहू ट्रेकला जोरात धडक दिली. यामुळे या क्रुझर गाडीतील चालकासह तीन जण जागेवरच ठार झाले तर पाच जण हे जखमी आहेत. क्रूझरमधील सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील सायखेडा गावातील असून, ते भोसरी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली. तर मालवाहू टेम्पो हा जळगाव वरून अवसरी येथील पॉलिटेक्निकल महाविद्यालयातील कपाट बेंच घेऊन येत होता
अपघाताची माहिती समजताच मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार राजेंद्र हिले व पोलीस कॉन्स्टेबल मोमीन यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.