मुंबई: महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यात ३६ आमदारांनी कॅबिनेट तर १० आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, अद्याप खातेवाटप झालेला नाही. दरम्यान, खातेवाटप होण्याआधीच शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते. सत्तारांसारखेच दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं.