नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार असल्याचा दावा लालू प्रसाद यादव यांनी आता केला आहे.
त्यासोबतच त्यामागचं कारणही सांगितलं आहे. “देशातील जनता वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे कंटाळली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2024 मध्ये हकालपट्टी होईल” असं म्हटलं आहे. यादव यांनी द क्विंटला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच पुढचे पंतप्रधान कोण होतील याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.
लालू प्रसाद यादव यांना पुढचा पंतप्रधान कोण असेल, असं विचारलं असता त्यांनी यावर नंतर चर्चा केली जाईल. राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “एक व्यक्ती काय बोलते किंवा विचार करते याने फरक पडत नाही. सर्व समविचारी पक्ष आणि यूपीएच्या सर्व मंत्र्यांनी भेटून चर्चा करावी” असं म्हटलं. तर राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का? असे विचारले असता “याचे उत्तर आपण नव्हे तर काँग्रेस पक्ष देईल” असं सांगितलं.
त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचारावर बोलताना लालूंनी हा दुष्प्रचार असल्याचं सांगितलं आहे. “ते समाजात जातीयवाद पसरवत आहेत. त्यांना (भाजपा) जातीयवादामुळे निवडणुकीत फायदा होत राहील आणि सत्ता मिळत राहील, असं वाटतं. जेव्हा मॉस्को (रशिया) येथील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर तेथील लोकांनी तोडलं. तेव्हा मी संसदेत बोललो. विश्व हिंदू परिषदेचे लोक तिथे जाऊन का थांबवत नाहीत? ते फक्त त्यांच्याच घरातले सिंह आहेत, गरीब मुस्लिमांना उद्ध्वस्त करण्यात आघाडीवर आहेत” असंही ते म्हणाले.
लालू प्रसाद यादव यांनी “सरकार सर्व काही खासगी कंपन्यांना देत आहे. ते लोक (उद्योगपती) काहीही मागतात, सरकार त्याचा लिलाव करते. रेल्वे खासगी क्षेत्राला देण्यात आली. तुमच्याकडे ट्रेनमध्ये टॉवेल आणि चादरही उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता तुम्ही घरून जेवण, ब्लँकेट, चादर घेऊन प्रवास करा. सरकारने सर्व काही संपवले आहे” असं म्हटलं आहे. लालू यांनी नितीश कुमार यांची खिल्ली उडवत त्यांना “कलही नारी” म्हणत सणसणीत टोला देखील लगावला आहे.