मुंबई : वाऱ्यांचा सध्याचा हा वेग पाहता पुढील दोन-तीन दिवसांत म्हणजेच ६ किंवा ७ जूनला ते महाराष्ट्रात दाखल होतील, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अंदमानमध्ये २१ मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंतचा प्रवास करण्यात काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुरुवातीच्या टप्प्यात चांगली प्रगती सुरू असताना नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच ते केरळमध्ये पोहोचतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र, नंतर बाष्पाअभावी त्यांची प्रगती खुंटल्याने त्याचा केरळमधील प्रवेश लांबला. नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा ३ जूनला ते केरळमध्ये दाखल झाले. या भागात पावसालाही सुरुवात झाली आहे.
४ जूनला त्यांनी दक्षिण अरबी समुद्रातून पुढे येत समुद्राच्या मध्य भागात प्रवेश केला आहे. केरळ आणि लक्षद्विपचा सर्व भाग त्यांनी व्यापला आहे. कर्नाटक किनारपट्टी आणि अंतर्गत भागातही त्याने प्रगती केली असून, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही त्यांनी प्रवेश केला आहे. मोसमी वारे आता कर्नाटकच्या कारवारपर्यंत आले आहेत.