पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर रुळेल असं महाराष्ट्रगान व्हायरल होत आहे. महाराष्ट्राची शान असलेले अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गीत प्रत्येक मराठी माणसाला स्फुर्ती देऊन जाते.
पुणे येथील ब्लिंक मोशन पिक्चर्स प्रा. ली. या कंपनीच्या माध्यमातून जळगावचा तरुण पुष्कर यावलकर आणि पुण्याची नेहा गुप्ता यांनी या गीताची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन सागर वंजारी यांनी केले आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तिला अभिमान वाटावं अस जबरदस्त गीत तसेच मराठमोळ्या संस्कृतीचं चवीनं गुणगान करणारं हे गीत आहे. कित्येक वर्षांनंतर असं ऐतिहासिक गीत आपल्या भेटीला आलं आहे.
या गाण्यामध्ये कमीत कमी वेळेत संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात आली आहे. या गीताचे चित्रीकरण पुणे येथील भोर तालुक्यात राजवाड्यात झाले आहे. भोर येथील राजवाडा केवळ राजवैभवाचे प्रतिक नसून वास्तूकला, व्यवस्थापन यांचा उत्तम नमुना आहे. तिसरे पंतसचिव चिमाजी नारायण यांच्या कारकीर्दीत १७४० मध्ये बांधलेला राजवाडा १८६८ मध्ये आगीत जळाला होता. श्रीमंत चिमणाजी रघुनाथ यांनी १८६९ मध्ये सुमारे दोन लाख रुपये खर्च करून वाड्याची नव्याने उभारणी केली. संस्थानिक वैभवाची साक्ष देणारा, कलाकुसरीने परिपूर्ण असा वास्तुकलेचा उत्तम नमुना तसेच जनमानसातही आदराचे स्थान असलेला भोरचा राजवाडा हा महाराष्ट्राचा अनमोल वारसा आहे.
या गीताचे चित्रकरण फक्त एका दिवसात करण्यात आले असून यात तब्बल २५० पेक्षा जास्त कलाकारांनी काम केलं आहे. आतापर्यंतच्या जाहिरात क्षेत्रात अगदी क्वचित अशी नाविन्यपूर्ण कल्पना असलेली आणि ऐतिहासिक जाहिरात बनवण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या गाण्याला एका मसाल्याच्या कंपनीने स्पॉन्सर केलं आहे. महाराष्ट्रातील सर्वांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल तसेच आपल्या संस्कृतीचा अस्मिता जपण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे.