चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्रपुरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भानामती केल्याच्या संशयातून चंद्रपूर येथे एका दलित कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. कोणताही पुरावा नसताना केवळ अंधश्रद्धेला बळी पडत गावातील अनेकांनी एकत्र येत या कुटुंबासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे.
दलित कुटुंबातील सात जणांना आरोपींनी भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण केल्याने सातही जण जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. संबंधित पाच गंभीर जखमींना चंद्रपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. संबंधित घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीपासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या अति दुर्गम भागातील वणी खुर्द गावात घडली आहे.
माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी उघडकीस आली आहे. पण घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतर यावर पोलिसांनी ठोस कारवाई केल्याचं दिसत नाही. याउलट या घटनेत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र किती लोकांवर गुन्हा दाखल केला? किती लोकांना अटक केली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
काही दिवसांपूर्वी गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी संचारली होती. गावातील दलित समाजातील 8 ते 10 वयोवृद्ध पुरुष आणि महिलांनी गावावर भानामती केल्याचं देवी संचारलेल्या महिलांनी सांगितलं. ही बाब समोर येताच गावातील काही जणांनी संबंधित सर्वांना गावातील चौकात आणलं. येथील खांबाना सर्वांचे हातपाय बांधत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत सात जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आलं आहे. संबंधित दलित समाजातील काही जणांना मारहाण होताना, भीतीनं गावातील कोणीही मध्ये पडले नाहीत. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात तणावाच वातावरण तयार झालं होतं.