दुग्धीच नवनीत असे हे आबालवृद्ध जाणतसे। परी मंथनविण कैसे । …

0

हरीविजय ग्रंथाचे कवी श्रीधर स्वामी यांनी पहिल्या अध्यायात मनुष्य जीवनाचे सार अत्यंत सोप्या शब्दात मांडले आहे. गुरुवंदनेचा हा अध्याय अध्यात्म ज्ञानासाठी संजीवनी आहे.

व्यास नारदासी शरण रिये । इंद्र बृहस्पतीच्या पायां लागे ॥
उमा शिवासी शरण रिये । आत्मज्ञान प्राप्तीसी ॥

व्यास नारदाला शरण गेले. इंद्र हा देवांचा राजा त्यानेही बृहस्पतीला गुरु केले. उमा म्हणजे भवानी पार्वती. यांनी साक्षात भगवान शंकराला गुरु केले. शुक्र, प्रल्हाद, नारद, वाल्मिक, वशिष्ठ यांनीही गुरु केले. गुरुशिवाय अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही मग हे अपरोक्ष ज्ञान कोणते ? त्यावर श्रीधर स्वामी म्हणतात – दुधामध्ये लोणी आहे . हे सर्वांना माहित आहे. पण त्यासाठी त्यात मुरण टाकावे लागते. दही बनवावे लागेल ते दही घुसळावे लागेल त्यातून मग लोणी या लोण्याचे तूप.. ! डोळे उत्तम देखणे सतेज असून चालत नाही ते ज्ञानचक्षु होण्यासाठी आणि प्रकाशाची अनुभूती मिळविण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन महत्वाचे आहे.

कलीयुगात जागोजागी गुरु भेटतात पण, त्यांची ओळख होणे महत्वाचे आहे. जन्मदाती आई, पालनपोषण करणारे वडील आणि प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक हे बालपणीचे गुरु. भगवान प्रभु रामचंद्रानी वसिष्ठ गुरु केले, सांदिपनींना कृष्ण परमात्म्याने गुरु केले. या सांप्रद स्थितीत गुरु कुणाला करावं ? गुरु कुणाला म्हणावं? गुरु कसा असावा ? या विषयी समाजात गोंधळ निर्माण झाला आहे. ग्रंथ हे गुरु आहेत हे प्राथमिक शाळेपासून सारेच शिकले आहेत. पण श्रीमद्भगवत गिता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नाथांचं भागवत, रामायण, पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय, सिद्धांत बोध, गुरुचरित्र , नवनाथ हे ग्रंथ वाचून पारायण करणारे व तसे आचरण करणारे गुरु महिमा, माहात्म्य ओरडून सांगतात. तरीही काही आडमार्गी जाणारे या समाजात कमी नाहीत ? नको त्यांना देव मानू नको त्या संताना गुरु मानू, नको त्या पंथाला धर्म मानून सडक्या विचारांना, पाखंडाला खतपाणी घालणारे महात्मे कमी नाहीत ? आपला देश हे हिंदुराष्ट्र आहे. राम कृष्ण ही आपली मुळ संस्कृती धरोवर आहे. आर्य सनातन संस्कृती ही आम्हा भारतीयांची मुळ संस्कृती आहे . हे तत्त्वज्ञावरील वरील ग्रंथ सांगतात ! पण हे ग्रंथ उघडून वाचायला तरी आमच्याकडे वेळ आहे का ? भारतात अलिकडे अध्यात्मीक गुरुंचा पेव फुटला आहे. देव, धर्म इत्यांदींचा प्रचार प्रसार न सांगता आपले आश्रम कसे मोठे होतील याविषयी लाख रुपये खर्चुन जाहीरात करणारे करोडोंची माया जमवतात. नंतर मात्र त्यांचे पितळ उघडे झाले की, त्यांना कारावास भोगावा लागतो. खून, बलात्कार, अवैध संपत्तीच्या नावाखाली आज कितीतरी महागुरु शिक्षा भोगत आहेत. असो मनुष्य जन्म लाभला आहे ना? गुरु केला पाहिजे. गुरुशिवाय तरणोपाय नाही.

गुरुपद सर्वात श्रेष्ठ॥ त्याहून नाही कुणी वरिष्ठ ॥
कल्पवृक्ष म्हणावा विशिष्ट तरी कल्पिले पुरवी तो ॥

गुरुदेवाला कल्पवृक्षासारखी उपमा श्रीधर स्वामिंनी दिली आहे. गुरुरूपी मेघ जेव्हा वर्षाव करतात तेव्हा शिष्याला दिव्यज्ञान प्राप्त होते त्याद्वारे ज्ञानाचे हे रोप वाढत जाते, यामुळे साधक चातक दोन्हीही तृप्त होतात. आई-वडिल जसे लहान बालकाचे संगोपन करतात तसे गुरु ही आपल्या शिष्यावर प्रेम करतात व शिष्य साधकाला श्रेष्ठत्वाला नेण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचेकडे निःसीम वेदांतज्ञान आहे ते गुरु…! महाभारताची निर्मिती करणारे पुराणपुरुष श्री वेदव्यास, शंभर कोटी रामायण कर्ते वाल्मिकऋषी, आणि संपूर्ण रघुवंशाचे गुरु वशिष्ठमुनी.. ज्यांच्या तेजाने चंद्र सुर्यही लाजतील आणि ज्यांनी आपल्या तपसामर्थ्याने काम जिंकून त्याला नामोहरम केलं आहे, शिवाय सुशिष्य म्हणून जो किर्तीमान स्थापीत आहे असा राजा परिक्षीत त्यांचे गुरु शुकदेव ….!

हरिविजय ग्रंथ प्रारंभी चौदा विद्याचा अधिपती श्रीमहागणपती, अगाधशक्ति देवी शारदा व सद्गुरु वंदना केल्याशिवाय या ग्रंथाला सुरुवात करताच आली नाही.

भगवंताचा राम अवतार समाप्त झाला. प्रलयानंतर उत्पत्ती स्थिती आली. पृथ्वीवर अराजकता माजली गाय, ब्राम्हण, त्रस्त झाले. सगळे त्राही माम्‌ त्राही माम्‌ करु लागले कंस, चाणुर, मुष्टीक, अध, बक, केशी, प्रलंब्दादी राक्षस माजले सर्वत्र हाहा:कार माजला. जरासंधाने 22 हजार राजे आपल्या बंदीवासात ठेवले. भौमासुर नरकासुर यांचा उत्पात वाढला. पाप कर्माला पारावार राहिला नाही. दुष्ट दुर्योधन, दुशासन, शकुनी, कर्ण यांनी अधर्माला जवळ केले. धर्माला किंमत दिली नाही. शेवटी भारानं पृथ्वी दुःखी झाली शेवटी अती झाल्यावर पृथ्वीने गायीचे रूप घेऊन हंबरडा फोडला. आक्रोश केला देवांचा राजा इंद्र, ब्रम्हदेव, पृथ्वी यांनी मग क्षिरसागरात महाविष्णुंना साकडे घातले तेव्हा भगवंतानी कृष्ण अवतारात भूतलावर मानव रूपात प्राकट्य केले. तो हा कृष्ण अवतार राम अवतार आणि कलि युगात अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा असलेला पंढरपुरातील सावळे परब्रम्ह पांडुरंग… आणि या तिघा अवतारांचा एक मंत्र माऊली महाविष्णुचा अवतार ज्ञानेश्वरांनी : ‘राम,कृष्ण,हरी` हा नामदेवांना दिला तेव्हापासून भागवत धर्माची पताका डौलाने फडकत आहे..!

– रमेश जे. पाटील
आडगांव ता. चोपडा जि. जळगांव (खान्देश 985098610)

Leave A Reply

Your email address will not be published.