मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर आता खुद्द कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तिने या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ‘मी दिलेल्या मुलाखतीत जे काहीही बोलले ते सर्व माहितीच्या आधारावर बोलले आहे. स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे १८५७ मध्ये लढले गेले. मला १८५७ ची माहिती आहे पण १९४७ मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. त्यामुळे या मुद्यावर मला माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन. कृपया मला याबाबत माहिती देण्यास कुणी मदत करा,’
‘मी यापूर्वी शहीद राणी लक्ष्मीबाई सारख्या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात भूमिका साकारण्यापूर्वी मी अनेक पुस्तके वाचली इतिहास वाचला आहे. त्यानुसार, १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बरेच संशोधन झाले होते. राष्ट्रवादासोबत दक्षिणपंथाचा उदय झाला पण ते अचानक नष्ट कसं झालं? महत्वाचे म्हणजे गांधींनी भगत सिंग यांना का मरू दिले. ?
तसेच नेता सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली ? इंग्रजांनी विभाजन का केले? भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ज्यासाठी मला मदत हवी आहे. असेही तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्यावर टीका करणाऱ्यांना प्रश्न विचारला आहे.
दरम्यान,फासावर गेलेल्या सर्व क्रांतीकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवलं? भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले पाहिजे. गेल्या ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे . सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून तिच्या कडून काढून घेण्यात यावे. अशी मागणी देशभरातून होत आहे.