चोपडा, (प्रतिनिधि मिलिंद डी सोनवणे)
चोपडा शहरातील पाटील गढ़ी,मल्हारपुरा आणि सर्व यावल रोड वरील कॉलनी वाशियांचा बाजारासाठी व शहरात येण्यासाठी रत्नावती नदीवरील जो पुल आहे त्यावरील नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईप लाईन आहे, ती तीन ते चार ठिकाणी लीक झाली असुन दररोज हजारों लीटर पाणी वाया जात आहे.
चोपडा शहरातील अर्ध्या गावाला जो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय, तिच मुख्य पाईप लाईन बऱ्याच महिन्यापासून लीक झाली असुन कोणताही नगरसेवक ह्या विषयी बोलायला तयार नाही, त्या ठिकाणाहूंन चार ते पाच नगरसेवक यांचा येण्याजाण्याचा रस्ता असुन सर्वच कानाडोळा करीत आहेत. बरेच टपरी धारक आणि छोटे मोठे व्यावसायिक या लीकेज झालेल्या पाईप लाईनमधून पिण्याचे पाणी भरतात. मात्र त्या ठिकाणी खाली नाला असुन मच्छी मार्केट ही बाजुलाच आहे,आणि त्या ठिकाणी ती ही घाण टाकली जाते. सर्वच शहरातील संडास बाथरूमचे पाणी ही सोडलेले आहे आणि अशा घाणेरड्या ठिकाणी मुख्य पिण्याची पाईप लाईन लीक आहे. सर्वच लोक बघ्याची भूमिका घेतात, मात्र कोणीही नगरपालिका प्रशासनाकड़े तक्रार करीत नाही ही शोकांतिका आहे.
आरोग्याचा प्रश्न एरणीवर
याच पाईपलाईन वरून बऱ्याच वर्षापासून पिण्याचे पाणी गावातील नागरिकांना पुरविले जाते. पावसाळ्यात तर या लीकेज असलेल्या पाईपमधे पुराचे पाणी, घाणीचे पाणी भरले जाते, तेच दूषित पाणी नागरिक पितात, म्हणून लवकरात लवकर ही लीकेज असलेली पाईप लाईन दुरुस्त करण्यात यावी.