सिंधुदुर्ग, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते.
एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची लावण्यात आली होती तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री पवार बसले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि राणे यांनी सोबत दीपप्रज्वलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
राणेंचे मुख्यमंत्र्यांसाठी देवतांना गाऱ्हाणे
यावेळी राणेंनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी विमानतळाचं श्रेय आपलंच असल्याचंही सांगितलं. तसेच राणेंनी चक्क मुख्यमंत्र्यांसाठी गाऱ्हाणंही घातलं. मुख्यमंत्री सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू करायला आले. मी इथल्या देव देवतांना गाऱ्हाणे घालेन, या सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य दे. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. ईडापिडा असतील तर दूर कर. अशी मी प्रार्थना करतो, असं राणे म्हणाले.
पेढ्याचा गुणधर्म घ्या
शिवसेनेचे आमदार मंत्री मागच्या बाजूला होते. तर भाजपचे आमदार, नेते, राणे पुढच्या रांगेत होते. विमानप्रवासात मराठीत घोषणा झाली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि जयघोष केला. विमान सुरु होताच खासदार विनायक राऊतांनी पेढे वाटले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विनायक राऊतांनी पेढे दिले. ‘गोड घ्या आणि गोड गोड बोला’ असं विनायक राऊतांनी राणेंना म्हटलं. राणेंनीही आपणही गोड गोड बोलावं असा संवाद झाला.
मुख्यमंत्री-नारायण राणेंमध्ये जुगलबंदी
मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात भाषणादरम्यान जुगलबंदी रंगली. राणेंनी आपल्या भाषणावेळी जे जे मनात होतं, ते ते सर्व बोलून मोकळे झाले. अगदी विमानतळाला विरोध करणारेच आता उद्घाटनाच्या मंचावर बसलेत, असं मुख्यमंत्र्यांसमोर राणे म्हणाले. राणेंनी आपल्या भाषणात अनेक टीकेचे बाण सोडले, सेना नेत्यांवर आरोप केले, शह देण्याचाही प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणावेळी राणेंच्या प्रत्येक टीकेला उत्तर दिलं, राणेंच्या शहला काटशह दिला, आपल्या भाषणाची वेळ येताच त्यांनी राणेंचा सगळा हिशेब व्याजासकट चुकता केला.
“लघु, सुक्ष्म का असेना पण नारायणराव आपण केंद्रीय मंत्री आहात”
“आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना, सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कडूपणा जाऊन गोडपणा जावा, अशी अपेक्षा नारायण राणेंनी आपल्या भाषणात व्यक्त केली होती. यावरही मुख्यमंत्र्यांना राणेंना चिमटा काढला. पेड्यातला गोडपणा अंगी बाळगावा लागतात, असं म्हणत त्यांनी राणेंवर प्रहार केला.