मुंबई : करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रातील नागरी भागात १४४ कलम लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं. लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय लोकलसेवाही बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, तरीही रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहताना मिळत आहे.