मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. दम्यान, वारंवार प्रशासनाकडून नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही भागांमध्ये या आवाहनाला धुडकावत नागरिक घराबाहेर पडत गर्दी करत आहेत. मुंबई-पुण्यातील लोक आज नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुंबईत मुलुंड आणि सायन येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार काल संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. त्याला राज्यातील जनतेने घरातच राहून चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर राज्यातील करोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला घरीच बसण्याचं आवाहन करत राज्यात जमाव बंदी आदेश लागू केले. ३१ मार्चपर्यंत जमाव बंदी आदेश लागू केल्याने राज्यातील जनता घरीच बसेल आणि सरकारला सहकार्य करेल असे वाटत असतानाच मुंबई आणि पुण्यात मात्र लोकांची प्रचंड बेपर्वाई दिसून आली.