मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लोकांनी ठिकठिकाणी गर्दी करु नये म्हणून जमावबंदीचे आदेशही देण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कठोर निर्णय घेत आहे. असाच एक निर्णय म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
एक्स्प्रेस-वे वर खासगी वाहनांना अडवले जात असून फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना जाण्याची परवानगी दिली जात आहे. फक्त एक्स्प्रेस वे नाही तर जुन्या मुंबई-पुणे हायवेवरही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईतील नागरिकांनी शहराबाहेर जाऊ नये तसेच पुणे किंवा इतर ठिकाणच्या लोकांनी मुंबईत प्रवेश करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.खालापूर, कळंबोली, कामशेत या टोलनाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस लोकांची ओळखपत्रे तपासत आहेत. जे लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत त्यांना पुन्हा आपल्या घरी पाठवले जात आहे.