नवी दिल्ली ;- दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलांमध्ये जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. ही चकमक कश्मीरच्या दक्षिण भागातील कुलगाम जिल्ह्यातल्या हलाण येथील पर्वतीय जंगलात झडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या हलाण नावाच्या या प्रदेशात टेकड्या असून त्यांवर वनप्रदेश आहे. या परिसरात दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती मिळाल्याने परिसराला घेराव टाकून नाकाबंदी करण्यात आली. तसंच, या परिसरात शोधमोहीमही राबवण्यात आली. या मोहिमेची चाहुल लागताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करायला सुरुवात केली. त्याला सैन्यातर्फे चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.
परंतु, या चकमकीत सैन्याचे तीन जवान गंभीररित्या जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान ते शहीद झाले. हिंदुस्थानी सैन्याच्या एका विभागाने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कुलगामच्या ऑपरेशन हलाण येथे उंचावर दहशतवाद्यांच्या अस्तित्वाचा सुगावा लागल्याने 4 ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. त्या मोहिमेत दहशतवाद्यांशी थेट सामना होऊन तीन जवान शहीद झाले. शोध मोहीम अद्यापही सुरू आहे, अशी माहिती सैन्यातर्फे देण्यात आली आहे.