मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूड क्वीन कंगना रणौत पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे खूप आभार मानले. मात्र, यानंतर एका मुलाखतीत बोलताना आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान केले.
यावरून देशभरातून कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कंगना रणौतला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करत नवाब मलिक यांनी कंगनाने केलेल्या वक्तव्यावर जोरदार निशाणा साधला. एक महिला जी चित्रपट अभिनेत्री आहे. केंद्र सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देण्याचे काम केले. तिच्या विधानाची आम्ही कठोर शब्दांत निंदा करतो. १८५७ पासून १९४७ पर्यंत या देशातून गोऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. जे लोक गोऱ्यांना पाठिंबा देत होते, त्यांच्या माध्यमातून पद्मश्री दिलेल्या लोकांना अशी विधाने करण्यासाठी पुढे केले जात आहे. त्यांनी लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. केंद्र सरकारने कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा आणि देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला तत्काळ अटक करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.